मुंबई । Mumbai
राज्यातील उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचेही नाव बदलण्यात आले आहे. इस्लामपूरचे नाव आता ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
या निर्णयाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले आहे. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या काही काळापासून स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. विशेषत: वाळवा तालुक्यातील नागरिकांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सदाभाऊ खोत यांनी सांगितले, “ईश्वरपूर नावाचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. याबद्दल मी ईश्वरपूरच्या नागरिकांचे अभिनंदन करतो.”
हा नाव बदलाचा निर्णय स्थानिक संस्कृती आणि इतिहासाशी जोडला गेला आहे. यापूर्वी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची नावे अनुक्रमे धाराशिव, अहिल्यादेवी नगर आणि छत्रपती संभाजीनगर अशी बदलण्यात आली होती. आता ईश्वरपूरच्या नावाने सांगली जिल्ह्यातील हे शहर नव्या ओळखीने पुढे येणार आहे.





