दिल्ली | Delhi
हमास आणि इस्रायली यांच्यात युद्ध सुरुच आहे. या युद्धात अनेक लोक जखमी झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासेने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला आणि या दोन्हींमध्ये युद्धाला सुरुवात झाली. आज, बुधवारी या युद्धाचा पाचवा दिवस आहे. मंगळवारी रात्री समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक तसेच सैनिकांचा समावेश आहे.
दरम्यान, जगभरातील देश सध्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुढे आले असून त्यांनी इस्रायलच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला शस्त्र सामग्री पुरवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यांनी मोदींना युद्धाची संपूर्ण माहिती दिली. यानंतर मोदींनी ट्विट केले की- या कठीण काळात भारतातील जनता इस्रायलसोबत आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहोत.
10 ऑक्टोबर रोजी इस्रायली सैन्याने घोषणा केली की- आम्ही गाझाची सीमा ताब्यात घेतली आहे आणि ती पूर्णपणे सील केली आहे. खरं तर 9 ऑक्टोबर रोजी इस्रायल सरकारने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. इस्रायलने गाझा सीमेवर 1 लाख सैनिक तैनात केले होते. तसेच 3 लाख सैनिकांना तयार राहण्यास सांगितले होते. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही गाझा पट्टीला अन्न, पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.