नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा हात पाय पसरायला सुरवात केली आहे. देशात आरोग्य आणि कुटूंब मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या घडीला ४ हजारांवर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दरम्यान आता WHO च्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी आता कोरोनाबाबत आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या सौम्या स्वामिनाथन?
WHO च्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या, “सध्या कोरोनाचा धोका वाढतो आहे ही बाब खरी आहे. मात्र चिंतेची आवश्यकता नाही. २०२० मध्ये जशी स्थिती आली होती तशी परिस्थिती आता येणार नाही.” एका मुलाखतीत सौम्या स्वामिनाथन यांनी हे भाष्य केले आहे. “Covid, SARS-CoV 2 हे विषाणूचे व्हेरिएंट आहेत. मात्र हा विषाणूचा व्हेरिएंट आता तसा सामान्य आहे. कोरोनाचा विषाणू म्युटेट होत असतो म्हणजेच त्यात सातत्याने बदल होतो आहे. आता कोरोना व्हायरसला पाच वर्षे झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. ”
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे, भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
२०२० मध्ये पहिल्या लाटेनंतर कोरोनाचा म्युटेंट तयार होऊन डेल्टा प्रकार आला होता, त्याची दुसरी लाट आली होती. तशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे का? त्यावर सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की अशी परिस्थिती आता पुन्हा येणार नाही. २०२० किंवा २०२१ सारखी परिस्थिती आता नसेल. त्यावेळी कोरोनाचा विषाणूच लोकांना माहीत नव्हता. मात्र तो अनुभव आता लोकांना येणार नाही, असे सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दोन ते तीन लाटा महाराष्ट्रासह देशाने अनुभवल्या आहेत. आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मात्र आता घाबरण्यासारखे काहीही कारण नाही असे सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा