दिल्ली । Delhi
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक राजीनामा दिल्याने गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी धनखड यांच्या गायब होण्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यमुळे राजकीय वातावरणात नव्याने चर्चेला उधाण आले आहे.
राऊत यांनी रविवारी (10 ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, 21 जुलैपासून जगदीप धनखड यांचा काहीच ठावठिकाणा नाही. “ते देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती होते. आम्ही त्यांच्यासोबत त्या दिवशी सकाळी चर्चा केली. त्यांची प्रकृती उत्तम दिसत होती, त्यांनी हास्यविनोदही केला. पण संध्याकाळी अचानक बातमी आली की त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. हा आमच्यासाठी धक्का होता,” असे राऊत यांनी सांगितले.
धनखड यांनी 21 जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून त्यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. “ते सध्या कुठे आहेत? त्यांच्या प्रकृतीची खरी परिस्थिती काय आहे? ते कोणासोबत आहेत? ते बरे आहेत का? की त्यांना कुठे गायब करण्यात आले आहे?” असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.
राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातूनही याबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. “उपराष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती अचानक गायब होणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नसेल, तर ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारे नेते गायब होण्याची पद्धत रशिया किंवा चीनमध्ये दिसते. भारतात अशी परंपरा सुरू झाली आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे राऊत यांनी “ते आजही आमच्यासाठी उपराष्ट्रपतीच आहेत” असे म्हटले आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला असून, धनखड यांच्या गायब होण्यामागील खरे कारण काय, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.




