मुंबई । Mumbai
जालना जिल्ह्यातून एक मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानातून जवळपास ५० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी अनुदानाची रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप आहे. उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनीही या अपहाराची कबुली दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात हेराफेरी करण्यात आली. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर तयार करून अनधिकृत अनुदान वितरित करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर ज्यांच्याकडे जमीन किंवा फळबागच नाही अशा नावांवरही अनुदान मंजूर करण्यात आलं.शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, प्राथमिक तपासातच मोठ्या अपहाराची माहिती समोर आली आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे.
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं, अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. यातील मंजूर अनुदानातून जवळपास सुमारे ५० कोटी रुपये अधिकाऱ्यांनी लंपास केल्याची माहिती खुद्द उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या या पैशावर डल्ला मारला आहे. याबाबतची सत्यता शासनाने पडताळावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. चारही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम होत आहे. सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे कुंपणच शेत खात आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. अपहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शक्यता आहे. अनुदानाच्या वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी नवे उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे. हा प्रकार समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना असा धोका निर्माण होणं हे चिंतेचं कारण आहे.