जामखेड | तालुका प्रतिनिधी
जामखेड शहरातील बीड रोडवर भीषण अपघात घडला. इर्टिगा कार रस्त्याच्या डिव्हायडरला आदळून पेट घेतल्याने गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.ही दुर्घटना २४ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नवले पेट्रोल पंप आणि नायरा पंपाच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तसेच अग्निशामक दलाला कळवले.
अपघातग्रस्त वाहन सीएनजीवर चालणारी इर्टिगा होती. अपघातानंतर गाडीच्या टाकीने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी आगीत होरपळून गेली. गाडीच्या लॉकिंग सिस्टममुळे आत असलेल्या दोन व्यक्तींना बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत जामखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी नरेश गुडवाल (३५) आणि साईनाथ पॉन शॉपचे मालक महादेव काळे (२८) यांचा जागीच मृत्यू झाला.
जामखेड नगरपरिषद अग्निशमन दलाचे आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी आग विझवण्यासाठी तब्बल एक तास प्रयत्न केले, मात्र गाडी पूर्ण जळून खाक झाली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे आणि न्यायवैद्यक पथक दाखल झाले.
गेल्या दोन वर्षांपासून जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण आहे. रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत, डिव्हायडर योग्य प्रकारे चिन्हांकित नाहीत आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी या अपघाताला महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितले. “रस्त्याची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वतःच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गाडीत अडकलेल्या लोकांचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. मात्र, आगीच्या भीषणतेमुळे कोणालाही मदत करता आली नाही.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांविरोधात रोष व्यक्त केला आहे. रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.