नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जण दगावले आहेत. त्यामध्ये पुण्यातील दोन, डोंबिवलीमधील ३ आणि नवी मुंबईतील १ पर्यटकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्यासह आणखी एका पर्यटकाचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.तसेच या हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ देखील समोर येत आहेत.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. विमानतळावर उतरताच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याबरोबर बैठक घेतली. तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला ‘अलिकडच्या वर्षांतील नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला’ असे म्हटले आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सरकारने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अनेक पर्यटकांनी आपली काश्मीरची यात्रा रद्द केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.