Saturday, July 27, 2024
Homeनगरजायकवाडी उपसा सिंचन विभागाच्या दोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

जायकवाडी उपसा सिंचन विभागाच्या दोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा येथील जायकवाडी उपसा सिंचन विभागाच्या दोषी कर्मचार्‍यांना अनियमितता व आर्थिक अपहार झाकण्याच्या हिशोबाने संधी दिली जात असूनही धरणग्रस्त व जायकवाडी लाभधारक शेतकर्‍यांची फसवणूक असल्याचा आरोप नेवासा तालुका जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीने केला असून दोषी कर्मचार्‍यांवर त्वरीत फौजदारी कारवाई करावी. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला तर शेतकरी कार्यालयांना कुलूप लावतील असा इशाराही दिला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, गेल्या महिन्यात जायकवाडी उपसा जलसिंचन विभाग अंतर्गत असलेल्या नेवासा शाखा क्रमांक 1 व शाखा क्रमांक 2 या कार्यालयातील काही कर्मचार्‍यांचा गैरप्रकार वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर उघडकीस आणला. शाखेतील कर्मचारी हे पैशाचा अपहार करून शेतकर्‍यांना पद्धतशीरपणे अनेक वर्षांपासून लुटत असल्याचे समर्पण फाउंडेशनने प्रत्यक्ष शेतकर्‍यांनी म्हणणे मांडून उघडकीस आणून दिले. याबाबत एकसदस्यीय उच्चस्तरीय समितीचा चौकशी अहवाल जायकवाडी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ शाखेस दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी पाठवण्यात आला. सर्व बाबींची शहानिशा करून एक महिन्याच्या आत दोषी कर्मचार्‍यांचे निलंबन होणे तसेच त्रयस्थ संस्थेद्वारे सदर शाखेची दफ्तर तपासणी व लेखापरीक्षण अहवाल होणे अपेक्षित होते. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी खात्यांतर्गत तपासणीचे आदेश दिले गेले.

दोषी कर्मचार्‍यांवर अनियमितता सिद्ध झाल्यावर कारवाई करण्याचे त्यात म्हटले गेले. समर्पण फाउंडेशन या कारवाईच्या पत्रावर व या चाललेल्या तपासणीच्या देखाव्यावर आक्षेप नोंदवला असून खात्यांतर्गत तपासणी व कारवाईने शेतकरी हिताचा कोणताही निर्णय होणार नसल्याचा व दोषी कर्मचार्‍यांना क्लीनचिट देण्यासाठी हे तपासणीचे नाटक सुरू असल्याचा दावा श्री. घुले यांनी केला.

वरिष्ठ कार्यालयाकडून दोषी कर्मचार्‍यांना सौम्य कारवाई करून व सोयीस्कर संज्ञेचा वापर करून वाचवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप केला. शेतकर्‍यांचे पैसे लुटून ते वर्षानुवर्षे आपल्याजवळ बाळगून शेतकर्‍याला कोणत्याही प्रकारची पावती न देणे याला अपहार करणे असे म्हणायला हवे आणि दोषी कर्मचार्‍यांनी दप्तर वेळेवर न भरणे, दप्तरात नोंदी न करणे भरलेली नसणे, भरणा केलेल्या पैशाच्या पावत्या शेतकर्‍यास वेळेवर न देणे, तसेच एका गोष्टीसाठी वसूल केलेले पैसे दुसर्‍याच सदराखाली शासनाकडे जमा करणे या सर्व बाबी अनियमिततेत येतात. म्हणून कर्मचार्‍याला पाठिशी न घालता पैशाचा अपहार केल्याप्रकरणी त्या कर्मचार्‍यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे.

सदर बाबतीमध्ये सर्व बाबी लक्षात येऊन सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडून वेळकाढूपणा करण्यात येत आहे दोषी कर्मचार्‍यांना दप्तर हाताने करू देऊन व पावती पुस्तके ताब्यात घेऊन त्यांना अनियमितता व आर्थिक अपहार झाकण्याच्या हिशोबाने संधी देण्यात येत आहे ही धरणग्रस्त व लाभधारक शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक आहे आम्ही याचा निषेध करत आहोत आणि त्वरित कारवाईची मागणी करत आहोत. असे निवेदन जायकवाडी उपसा सिंचन उपविभागीय अभियंता यांना दिले. यावेळी नेवासा तालुका जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समितीचे सचिव जगन्नाथ कोरडे गोधेगावचे सरपंच राजू गोलांडे, शरद शेलार, राहुल चिंधे व डॉ. करणसिंह घुले हे उपस्थित होते.

…तर कार्यालयांना लावणार कुलूप!

शेतकर्‍यांकडून घेतलेले पैसे हे शेतकर्‍यांच्या थकबाकीत भरण्यात यावेत. दप्तर तपासणी व लेखापरीक्षण जायकवाडी जलसंपदा व्यतिरिक्त दुसर्‍या संस्थेकडून करण्यात यावे. दोषी कर्मचार्‍यांना दप्तर हाताळणी करू देऊ नये तसेच दप्तरात नोंदी करण्यास मज्जाव करण्यात यावा. दोषी कर्मचार्‍यांकडे असलेली पावती पुस्तके तातडीने जमा करून घेण्यात यावीत. वरील सर्व मागण्या विनाविलंब कार्यान्वित झाल्या नाहीत तर जायकवाडी उपसा जलसिंचन योजनेची कार्यालये चालू ठेवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार जायकवाडी जलसंपदा विभागाला राहात नाही म्हणून शेतकरी या कार्यालयांना कुलूप लावून येथील काम बंद करतील असा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या