मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल (शनिवारी, ता ४) आरोप केला होता की, १९९३ साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? जाळून घेतले की जाळले? आजही खेडमध्ये घटनेचे साक्षीदार आहेत. गरज पडली तर त्यांनाही मी समोर आणेल. खूप साक्षीदार आहेत असे अनिल परब यांनी म्हटले होते. यावर आता ज्योती रामदास कदम यांनी भाष्य केले आहे.
अनिल परब यांनी आरोप करताना रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम राज्याचा गृह राज्यमंत्री आहे. त्यामुळे त्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कदम यांच्या घरात १९९३ साली काय झाले होते, हे शोधण्यासाठी कदम यांची नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी परब यांनी केली. कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळण्यात आले होते? यासाठी नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत कदम यांनी केलेला दावा धादांत खोटा ,असेही अनिल परब म्हणाले. त्या आरोपांवरती आज रामदास कदम यांच्या पत्नीने स्पष्टीकरण दिले आहे.
ज्योती कदम नेमक काय म्हणाल्या?
रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी आज माध्यमांसमोर बोलताना म्हणाल्या की, काल जे आरोप केले ते खोटे आहेत. काल त्यांनी जे आरोप केले ते फार चुकीचे आहेत, तेव्हा असे काही झाले नव्हते, तेव्हा आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की, आमच्याकडे गॅस सिलेंडर असावा, मी स्टोव्हवरती स्वयंपाक करत होते, मी स्वयंपाक करत होते तेव्हात स्टोव्हने आधी माझा पदर जळला, त्यानंतर ही घटना घडली होती. मला वाचवताना त्याचे हात देखील भाजले होते, मला त्यांनी रूग्णालयात नेले, मला वाचवण्यासाठी बाहेर देशात ट्रीटमेंटला नेले होते, हे फार चुकीचे आरोप आहेत, आम्हाला बदनाम करू नका, आम्हाला त्रास होतो आहे, मी पहिल्यांदा मी मिडियासमोर आले आहे, असेही त्या म्हणाल्यात.
रामदास कदम काय म्हणाले?
रामदास कदम यांनीही या प्रकरणावर भाष्य केले होते. कदम म्हणाले होते की,अनिल परब यांच्याविरोधात माझी पत्नी कोर्टात जाणार आहे. बदनामी करण्याचे काम परबांनी केले आहे. त्यावेळी काय झाले हे अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा.
खेडच्या घरात आग कशी लागली? याची त्यांनी माहिती दिली.कदम म्हणाले, खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते. तेव्हा स्टोव्हवर जेवण बनवायचो. जेवण बनत असताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली. त्यावेळी मीच पत्नीला वाचवले. पत्नीला वाचवत असताना माझे हात भाजले. कदम पुढे म्हणाले की, पत्नी भाजल्यानंतर पुढील सहा महिने तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. मीदेखील पत्नीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात होतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली होती, अशी माहिती देखील त्यांनी दिली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




