मुंबई | Mumbai
मुंबईतील दादर (Dadar) येथील कबुतरखान्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने (Mumbai NMC) मुंबईतील कबुतरखाने बंद केले होते. यानंतर दादरच्या कबुतरखान्याजवळ जैन समजाकडून आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनादरम्यान कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री देखील फाडून टाकण्यात आली. यावेळी जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni) यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती.
जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain muni Nileshchandra Vijay) यांनी,”आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू, असं विधान केले होते. मात्र, आता जैन मुनी निलशचंद्र विजय यांनी या विधानावरून यू-टर्न घेतल्याचे बघायला मिळत आहे.
ते म्हणाले की, “मी शांतीने आंदोलन (Agitation) करणार आहे. तसेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने आमचे ऐकले नाही, तर आम्ही शस्त्र उचलू, पण शस्त्र उचलू म्हणजे आम्ही महात्मा गांधी यांनी जसे शांततेने आंदोलन केले, तसे शांतीपूर्ण आंदोलन आम्ही करु, असे निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. तसेच देशभरातील जैन बांधव आंदोलनासाठी या ठिकाणी येतील. जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातील १० लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशाराही निलेशचंद्र विजय यांनी दिला.
…तर जैन समाज तुमच्या विरोधात जाईल
जैन मुनी निलेशचंद्र पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जैन समाज नाराज होत आहे, आक्रमक होत आहे. येणाऱ्या काळात जैन समाज तुमच्या विरोधात जाईल. हा राजकीय नसून धार्मिक विषय आहे. जैन समाज तुमच्यासोबत जोडला गेला, कारण तुम्ही धार्मिक आहात. तुम्ही गोमातेला राजमाता घोषित केले”, असे त्यांनी म्हटले.
निलेशचंद्र विजय यांचं राज ठाकरेंना साकडं
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साकडं घालताना म्हटले की, “तुम्ही मराठी-मारवाडी वाद मिटवा. तसेच आम्ही मारवाडी लोक देखील तुमच्यासोबत आहेत. जो कोणी मराठी भाषेचा अपमान करतील, जो मराठी भाषेला सन्मान देत नाही, त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तसेच मराठी लोकांची मी माफी मागतो, मराठी एकीकरण समितीचा गैरसमज झाला आहे, असेही जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले.




