नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश आहे. राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल. हे सर्व जण यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील रहिवासी होते.
केदारनाथमध्ये मोठ्या संख्येने भाविक केदारधामला दर्शनासाठी जात असतात. पण या यात्रेत अनेक भाविक चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. या ठिकाणी अनेक खासगी कंपन्या हेलिकॉप्टर सेवा पुरवतात आणि अनेक वेळा नियमांची पायमल्ली करतात, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात पायलटसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल असे मृतांमधील व्यक्तींची नावे आहेत.
रविवारी (ता. 15 जून) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास केदारनाथहून गुप्तकाशी येथे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण दरम्यानच्या जंगलात अपघात झाला. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर गौरीकुंड परिसरातून मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. या परिसरात गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला अपघाताची माहिती दिली.
माहिती मिळताच, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत ५ प्रौढ आणि २ लहान मुले प्रवास करत होते, ज्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरलेले पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात सर्व सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एक वर्षांपूर्वीच राजकुमार यांनी त्यांच्या मुलीचे नामकरण ‘काशी’ असे केले होते. तिच्या नावाने वणी शहरात मोठ्या भक्तिभावाने काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. प्रदीप मिश्रा यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ही कथा शहरवासीयांनी अनुभवली होती. पण ज्या लेकीच्या नावाने जैस्वाल कुटुंबाने घर उभारले, तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, तिचाच या अपघातात मृत्यू झाल्याने जैस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जनपद रुद्रप्रयाग में हेलीकॉप्टर के दुर्घटनाग्रस्त होने का अत्यंत दुःखद समाचार प्राप्त हुआ है। एसडीआरएफ, स्थानीय प्रशासन एवं अन्य रेस्क्यू दल राहत एवं बचाव कार्यों में जुटे हैं।
बाबा केदार से सभी यात्रियों के सकुशल होने की कामना करता हूँ।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 15, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून शोक व्यक्त
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन, इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह धामी म्हणाले.
चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित
उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ आज एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता हेलिकॉप्टर सेवेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गौरीकुंडला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, याचा परिणाम आता चारधाम यात्रेच्या हेलिकॉप्टर सेवेवरही झाला आहे. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश पाळला जाईल.
रुद्रप्रयाग में हुई हेलीकॉप्टर दुर्घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है। इस पीड़ादायक हादसे में दिवंगत जनों के प्रति अपनी गहरी संवेदना प्रकट करता हूं। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगतों की आत्मा को श्री चरणों में स्थान एवं शोकाकुल परिजनों को यह असीम कष्ट सहन करने की शक्ति प्रदान करें।… pic.twitter.com/LaD7M1Gb4D
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 15, 2025
मुख्यमंत्र्यांचे आदेश
उत्तराखंडमधील वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कडक आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ‘राज्यात हेली सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी तयार करावी, यामध्ये उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती पूर्णपणे तपासली पाहिजे.’ याशिवाय, हवामानाची अचूक माहिती असणे देखील बंधनकारक करावे. मुख्यमंत्री धामी यांनी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती हेली ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंचा आढावा घेतल्यानंतर एसओपी तयार करेल.