अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहिम राबवली असून या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्या आहेत. नियमबाह्य कामकाज करणार्या केंद्रांवर कारवाई करत राहुरी तालुक्यातील 2 आणि नेवासा तालुक्यातील 1 असे 3 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी विभागाच्या तपासणीत विविध त्रुटी उघड झाल्या असून त्यामध्ये भाव फलक व साठा फलक नसणे, विक्री परवाना दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्ययावत नसणे, स्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे, टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसणे आणि खतांची विक्री पॉस मशिनवरून न करणे अशा गंभीर त्रुटींचा समावेश आहे. तपासणीनंतर दोषी ठरलेल्या केंद्रांना नोटीस देऊन सुनावणीही घेण्यात आली.
या सुनावणीदरम्यान दोष सिद्ध झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
विक्री परवाने घेतले असतानाही दुकाने बंद ठेवणार्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत राहुरी तालुक्यात 4, अकोले 6, नेवासा 5, शेवगाव 3, नगर 3 आणि पाथर्डी 3 अशा 24 विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात शेतकर्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात, यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरू राहणार असून, नियमभंग करणार्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्पष्ट केले आहे.