अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 ची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा हंगामासाठी सात लाख 42 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान हंगामासाठी 86 हजार 618 बियाण्याची गरज असून कृषी विभागाने खाजगी व सार्वजनिक बियाणे कंपनीकडे ही मागणी नोंदवली आहे. यंदा हवामान विभागाने सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने कृषी विभागाने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात एप्रिल, मे महिन्यांत खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. जिल्ह्यात खरीप हंगामाचे पाच लाख 62 हजार 21 हेक्टर सरासरी क्षेत्र असून मागील वर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सात लाख 23 हजार 112 हेक्टर वर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या होत्या. नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा असून परतीच्या पावसावर जिल्ह्यातील शेतीचे चित्र अवलंबून राहते. मात्र, गेल्या काही वर्षात खरीप हंगामाच्या सुरुवातीला अथवा तोंडावर दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.
खरीप हंगामात अकोले तालुक्यात भात हे मुख्य पीक असून उर्वरित भागात बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशी हे मुख्य पीक मानले जाते. गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख 55 हजार 825 हेक्टर वर कपाशी लागवड झाली होती, तर सोयाबीन पिकाची 1 लाख 86 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यासह उडीद, तुर या पिकाच्या पेरणीचे प्रमाण चांगले होते. गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता जिल्ह्यात सातत्याने बाजरीच्या क्षेत्रात घट येताना दिसत असून यंदा देखील जिल्ह्यात बाजरीचे अवघे 85 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या तुलनेत सोयाबीन आणि कपाशी पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
पावसाने साथ दिल्यास जिल्ह्याच्या उत्तर भागासह पाठवण्याची सोय असणार्या भागात कपाशी पिकाचे क्षेत्र वाढण्याची आशा कृषी विभागाला आहे. दरम्यान, हंगामासाठी 44 हजार 648 क्विंटल सार्वजनिक व 41 हजार 969 खाजगी कंपन्यांकडे असे 86 हजार 618 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. पंधरा मे नंतर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आवश्यक असणार्या बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हंगामासाठी आवश्यक असणारे रासायनिक खतांचा बफर स्टॉक करण्यासह ज्याज्या शेतकर्यांना शक्य आहे, त्यांनी उन्हाळ्यातच आवश्यक खतांची खरेदी करून त्याची साठवणूक करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान बियाणे कीटकनाशके आणि खतांच्या तपासणीसाठी कृषी विभागाच्या वतीने पतके स्थापन करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
असे आहे प्रस्तावित नियोजन
भात 21 हजार हेक्टर, बाजरी 85 हजार हेक्टर, मका 91 हजार हेक्टर, तूर 77 हजार हेक्टर, मूग 51 हजार हेक्टर, उडिद 71 हजार हेक्टर, सोयाबीन 1 लाख 90 हजार हेक्टर, कपाशी 1 लाख 56 हजार हेक्टर.