नवी दिल्ली | New Delhi –
नाशिवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या किसान रेलसेवेचा Kisan Rail शुभारंभ उद्यापासून (7 ऑगस्ट) होणार आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतूक करणारी पहिली रेल्वे उद्या महाराष्ट्रातील देवळाली येथून बिहारमधील दानापूर येथे रवाना होईल, अशी माहिती भारतीय रेल्वेने आज दिली.
खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून किसान रेल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी Finance Minister Nirmala Sitharaman अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली होती. Budget 2020 नाशिवंत कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात किसान रेल या शीत रेल्वेगाडीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या सेवेचा शुभारंभ उद्या होत असून, पहिली किसान रेल्वे महाराष्ट्रातील देवळाली येथून सकाळी 11 वाजता बिहारच्या दानापूरकडे रवाना होईल. ही रेल्वेगाडी साप्ताहिक असेल, असे रेल्वेमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देवळालीहून सुटलेली ही गाडी 31.45 तासांत 1,519 किमीचे अंतर कापून दुसर्या दिवशी सायंकाळी 6.45 वाजता दानापूर येथे पोहोचेल, असे या निवेदनात म्हटले आहे. मध्यरेल्वेचा भुसावळ विभाग मुळात कृषी आधारित विभाग आहे आणि नाशिक तसेच इतर जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला, फळे, फुले ही नाशिवंत, तर कांदा व इतर कृषीमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
हा नाशिवंत कृषी माल प्रामुख्याने पाटणा, अलाहबाद, कटनी, सतना आणि इतरत्र पाठवला जातो. या पहिल्या किसान रेल्वेला नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्यायनगर आणि बक्सर येथे थांबे देण्यात आले आहेत.
स्थानिक शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि व्यापार्यांकडून आक्रमकपणे विपणन केले जात आहे. या रेल्वेची माहिती देण्यासाठी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात करण्यात आली. कृषी मालाच्या वाहतुकीची मागणी वाढत असून, शेतकर्यांच्या मदतीने या रेल्वेगाडीला मोठा प्रतिसाद लाभेल, इतर नियमित दरांप्रमाणेच यासाठी भाडे आकारले जाणार आहे, असे रेल्वेने या निवेदनात म्हटले आहे.