कोल्हार |वार्ताहर| Kolhar
गेल्या काही दिवसांपासून कोल्हार (Kolhar) भगवतीपूर शिवारात बिबट्यांचा (Leopard) मुक्त संचार वाढला आहे. कोल्हारमध्ये नवीन साठवण तलावाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी दोन दिवसात दोन बिबटे पिंजर्यात (Cage) जेरबंद झाले. हे दोघेही एक वर्षाचे बछडे असून अजूनही नर मादी अशा दोन बिबट्यांचा मुक्त संचार या भागात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी असलेल्या शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उर्वरित दोन बिबट्यांनाही जेरबंद करण्याची मागणी शेतकर्यांकडून जोर धरू लागली आहे.
कोल्हार भगवतीपूरच्या नवीन साठवण तलावाचे काम सुरू आहे, त्याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नर मादी व त्यांचे दोन बछडे अशा चार बिबट्यांचा (Leopard) वावर वाढला आहे. या परिसरात दाट ऊस, फळबागा असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सोयीची जागा आहे. बिबट्यांच्या वास्तव्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे शेतीपिकांना रात्रीचे पाणी देणे तर दूरच रात्री घराबाहेरदेखील कोणीही निघत नाही. स्थानिक शेतकर्यांनी वनविभागाला या भागात पिंजरा लावण्याची अनेकदा मागणी केली. शेवटी स्थानिक शेतकर्यांनी स्वखर्चाने वनविभागाकडून (Forest Department) पिंजरा आणून याठिकाणी लावला. दोन दिवसापूर्वी अर्थात रविवारी मादी जातीचा अंदाजे एक वर्ष वयाचा बिबट्याचा बछडा या पिंजर्यात जेरबंद झाला. वनविभागाने त्याला नेले आणि पुन्हा या भागात पिंजरा लावला. यात पुन्हा यश मिळाले. काल मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास नर जातीचा अंदाजे एक वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा पिंजर्यात अडकला.
सकाळी बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाला (Forest Department) कळविण्यात आले. काल सकाळी वन विभागाने सदर बिबट्या नेला असून माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात त्याला सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाचे वनरक्षक प्रतीक गजेवार यांनी दिली. दोन बछडे पिंजर्यात (Cage) अडकले असले तरी अजूनही दोन बिबटे मुक्तपणे संचार करीत आहेत. त्यामुळे येथील भीतीचे सावट अजून संपले नाही. उर्वरित दोन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्यांपासून येथील शेतकर्यांची सुटका करावी अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिकांना उर्वरित दोन बिबटे पिंजर्यात अडकण्याची प्रतीक्षा आहे.