मुंबई | Mumbai
महायुती सरकारची महत्वकांक्षी असलेली योजना लाडकी बहीण योजनेबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे.
महायुती सरकारने राज्यातील सर्व सामान्य महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र आता या योजनेत मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती. आरोपी प्रतीक पटेलने त्याची काही माणसे या कामासाठी नेमली आणि बनावट बँक खाती उघडली. अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली की, या खात्यांद्वारे कोट्यवधींचे व्यव्हार झाले आहे. यात सायबर फ्रॉड, ब्लॅक मनी असे पैसे या खात्यात जमा केले जात होते.याप्रकरणी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, आरोपी हे गरीब प्रवर्गातील निष्पाप लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांची बँक खाती सायबर गुन्हेगारांना विकायचे. आत्तापर्यंत तपासात २५०० बँक खाती उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील काही खाती सायबर गुन्हेगारांना आणि मनी लाँड्रिंग करणाऱ्यांना विकण्यात आली आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी गुजरातमधील सुरत शहरातून रॅकेट चालवत होते.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणात अविनाशसह फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरोपी श्रुती राऊतच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँकांचे पासबुक, बँकांशी संलग्न सिमकार्ड्स पोलिसांना मिळाले. “आम्ही १०० हून अधिक खाती संबंधित बँकेला संपर्क साधून बंद केली आहेत. त्याचप्रमाणे १९.४३ लाख रुपयांची रोकड जप्त केली”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीचा छडा जरी पोलिसांनी लावला असला तरी या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
आरोपी अविनाश कांबळे हा नेहरूनगर, देवनार, डीएन नगर, धारावी इथल्या परिसरातील झोपडपट्टी परिसरात फिरून ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली लोकांकडून कागदपत्रे घेऊन बँक खाती उघडायचा आणि त्यांना तात्काळ एक हजार रुपये द्यायचा. त्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील असे आश्वासनही तो त्यांना द्यायचा. तात्काळ हजार रुपये मिळत असल्याने लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसायचा.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा