लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे नाव भारतीय संगीत क्षेत्रांमध्ये गाजलेलं नाव आहे. मोठ-मोठ्या गायक गायिकांच्या यादीमध्ये लता मंगेशकर हे नाव येतं. लता मंगेशकर यांचा उल्लेख भारताच्या सर्वोत्कृष्ट गायिकांमध्ये येतो. लता मंगेशकर या एक महान गायिका आहेत. भारताची गानकोकिळा अशी लता मंगेशकर यांची विशेष ओळख आहे. लता मंगेशकर यांनी म्युझिक इंडस्ट्रीला एकोणिसाव्या शतकामध्ये एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलं.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आज आपला ९२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये त्यांचा जन्म झाला. लता दिदींचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हेदेखील प्रसिद्ध संगितकार होते. यांचा वारसा त्यांच्या मुलांनी चालवला. आपल्या सुमधुर कोकिळेसारख्या आवाजामुळे लतादीदी जगविख्यात झाल्या. त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये लाखो गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून गाणं म्हणणाऱ्या लतादीदींचे आजही पाकिस्तान आणि बांगलादेशात चाहते आहेत.
लतादीदींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्याचे २५ रुपये मिळाले होते आणि याच २५ रुपयांना आपली पहिली कमाई त्या मानतात. १९४२ साली ‘किती हासाल’ या मराठी सिनेमातील गीत गाऊन त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं. १९४९ मध्ये महल सिनेमातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांची हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर राज कपूर यांच्या ‘बरसात’मधील ‘जिया बेकरार है’, ‘हवा में उडता जाए’सारख्या गाण्यांमुळे लता मंगेशकर हे नाव हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी गायक-गायिकांच्या यादीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचलं आणि ते आजतागायत पहिल्याच स्थानावर आहे.
लता मंगेशकर यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या करिअरमध्ये एकूण चारवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७२ साली ‘परिचय’, १९७५ साली ‘कोरा कागज’ आणि १९९० साली ‘लेकिन’ या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. याशिवाय, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मविभूषण, २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्नने त्यांचा सन्मान झाला.
लता मंगेशकर यांचं वय आज ९२ वर्षे आहे. असं असलं तरी आजही त्यांनी लग्न केलंलं नाही. त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे. लता मंगेशकर यांचे डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते, असे म्हटले जाते. राज सिंह हे लता मंगेशकर यांच्या भावाचे खूप जवळचे मित्र होते.
सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला. लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. त्यांनी घरची जबाबदारी खूपच चांगल्याप्रकारे पेलली. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, यामुळे त्यांनी कधीही लग्न केले नाही, असे म्हटले जाते. पण खरं कारण वेगळे होते, असे देखील काहीजण म्हणतात.
१९६२ मध्ये जेव्हा लतादीदी ३२ वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांना स्लो पॉईजन देण्यात आलं होतं. लतादीदी यांच्या निकटवर्तीय पद्मा सचदेव यांनी ‘ऐसा कहाँ से लाऊं’ या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे. त्यानंतर लेखक मजरुह सुल्तानपुरी अनेक दिवस लतादीदींच्या घरी जाऊन स्वत: जेवण चाखून मग लतादीदींना देत असत, असेही पद्मा सचदेव यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र, लतादीदींना मारण्याचा का प्रयत्न झाला, हे अद्याप उघड झालं नाही.