मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. तर ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,१२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३२३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १३, पुणे महानगरपालिका येथे ४ तर मालेगाव येथे १, पुणे ग्रामीणमध्ये १, पिंपरी चिंचवडमध्ये १, धुळे येथे १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये (५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.