नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती जितेंद्र शां. जैन यांनी केले.
न्यायमूर्ती जैन यांनी शनिवारी (दि. 26) नाशिकरोड न्यायालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बार रूममध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी न्या. जैन म्हणाले की, न्यायदान प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकरणांत निकाल दिले जातात. त्या निकालांचा वकिलांनी अभ्यास करावा. तसेच दरमहा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण निकालावर बार असोसिएशनच्या माध्यमातून चर्चासत्राचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. न्या. जैन यांनी येथील वकिलांना दैनंदिन कामकाजात येणार्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. नाशिकरोड येथे दोन महिन्यांपूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या दोन न्यायालयांचे कामकाज सुरू झाले आहेत. तथापि अपुर्या कर्मचारी संख्येमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अॅड. सुदाम गायकवाड यांनी वाढीव कर्मचार्यांची मागणी करून तसे आदेश जिल्हा न्यायाधीशांना देण्याची विनंती केली. यावेळी वकिलांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नांना न्या. जैन यांनी समाधानकारक उत्तरे दिले.त्यानंतर नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयातही न्या. जैन यांनी भेट देत तेथील अडचणींचा आढावा घेतला.
यावेळी अॅड. चैताली कुटे यांनी येथील कौटुंबिक न्यायालयाच्या स्थलांतरास विरोध करताना या न्यायालयास नाशिकरोड हेच सर्वार्थाने कसे योग्य आहे, याबाबत अभ्यासात्मक विवेचन करून सोदाहरण स्पष्ट केले. येथील रेल्वे कनेक्टिव्हीटी, इतर सुविधा व पक्षकारांच्या दृष्टीने असणार्या सर्व सोयींबाबत अॅड. वर्षा देशमुख यांनी न्यायमूर्तीसमोर बाजू मांडली. नाशिकरोड येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयास मंजुरी मिळालेली असून कोर्ट हॉल देखील तयार आहे, केवळ त्याचे अधिकृत उद्घाटन बाकी असल्याने ते लवकरात लवकर करावे, अशी विनंती अॅड. सुदाम गायकवाड यांनी केली.
याप्रसंगी नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, नाशिकरोड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यासह नाशिकरोड न्यायालयातील सर्व न्यायाधीश आदींसह नाशिकरोड बार असोसिएशनचे अॅड. बी. बी. आरणे, अॅड. संग्राम पुडे, अॅड. प्रमोद कासार, अॅड. मनीषा बेदरकर, अॅड. दमयंती दोंदे यांच्यासह ज्येष्ठ वकील सुहास पाठक, चंद्रभान पुंडे, योगेश सारडा, राजेंद्र बघडाणे, शिरीष पाटील, विजय शिंदे, संजयकुमार मुठाळ, ब्रिजेश रामराजे, दीपक बर्वे, धम्मपाल रुपवते, अभय परदेशी, नीता शेलार, जयंत शेलार, संदीप बनसोडे, अनिकेत वाडेकर, प्रेमनाथ पवार, पौर्णिमा पगारे, विद्या जाधव आदी वकील सभासद व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. उमेश साठे यांनी केले.