नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या बालकाचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला होता. तीन वर्षाच्या आयुषच्या मृत्युने सर्वांच्या मनाला चटका बसला. या घटने नंतर वनविभागावर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयावर बिबट्या जेरबंद करा, यासाठी मोर्चा काढला. बिबट्याला पकडा अन्यथा वन मंत्र्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात या परिसरात एक बिबट्या शुक्रवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतरही या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. त्यानंतर आता सोमवारी मध्यरात्री जयभवानी नगर, पिंपळगाव खांब येथे अजून एक बिबट्या जेरबंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिपंळगाव खांब येथील बाळासाहेब अमृता जाधव यांच्या शेतामध्ये पिंजरा लावलेला असतानाच सोमवारी मध्यरात्री हा बिबट्या जेरबंद झाला आहे. वनविभागाने वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, वडाळा आणि इंदिरानगर भागात साधारण २५ पिंजरे लावले आहे. या भागात बिबट्य दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यातच तीन दिवसाच्या अंतरात दोन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





