अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने बिबट्या प्रवण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ ही सौरऊर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बिबट्याची हालचाल कॅमेर्यात कैद होताच ही यंत्रणा तात्काळ सायरनव्दारे नागरिकांना सावध करणार असून, त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणार्या कामरगाव येथे मंगळवारी (23 डिसेंबर) ही यंत्रणा बसविण्यात आली. या प्रणालीत ‘अॅडव्हान्स कॉम्प्युटर व्हिजन’ व ‘डीप लर्निंग’ या अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बिबट्या या वन्य प्राण्याचा स्वतंत्र डेटाबेस या उपकरणात फीड करण्यात आला असल्याने कॅमेर्यासमोर बिबट्या आल्याचे ओळखताच यंत्रणा आपोआप सक्रिय होते व मोठ्या आवाजातील सायरनव्दारे गावकर्यांना धोक्याचा इशारा देते.
या यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय कार्यरत राहते. सौरऊर्जेवर चालणारी ही यंत्रणा ग्रामीण व जंगलालगतच्या भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सायरनच्या इशार्यामुळे नागरिक सतर्क राहून घराबाहेर जाणे टाळू शकतात तसेच जनावरे व लहान मुलांची काळजी घेणे शक्य होते. बिबट्या-मानव संघर्ष टाळण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून वन विभागाला तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच निधीतून प्रायोगिक तत्त्वावर हा अभिनव प्रकल्प उभारण्यात आला आहे. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव येथील मुरलीनगर व खंडोबा मंदिर परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या ‘एआय’ प्रणालीमुळे केवळ सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले जात नाही, तर बिबट्यांच्या हालचाली, वेळ, वावराचा परिसर यासंबंधी अचूक माहिती वन विभागाला मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात बिबट्या-मानव संघर्ष व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.




