शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav
करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 चे वर्ग अध्यापन व शाळा उशिरा सुरू होणार असल्याने पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.
करोना महामारीच्या संकटामुळे यावर्षी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे नियोजित पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम कमी करण्यासाठी पालकांकडून तसेच शिक्षकाकडून विचारणा होत आहे. शिवाय देशातील अन्य बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्याचे घोषित केले आहे.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र बोर्ड संलग्न शाळातील पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने वरील मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा असे नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, शरद दळवी, सखाराम गारूडकर, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, बाबासाहेब बोड़खे, शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते सतीश जगदाळे, अमृत गोरे, सत्यवान थोरे, सुधीर आपटे, प्रदीप बोरुडे, देवीप्रसाद जोशी, सुधीर बढ़े, प्रदीप पांडव, हरिभाऊ कोथिंबिरे, संदीप झाडे, कारभारी लोणारी, रवींद्र पवार, बाळासाहेब घावटे आदी पदाधिकार्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली.