नवी दिल्ली : देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले. मात्र, राज्य सरकारच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेते त्यावर आगामी लॉकडाऊनच्या नियम व अटी लागू राहणार आहेत.
आज लॉकडाऊन 5 साठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असेल. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असतील. दुकानांमध्ये केवळ 5 जण एकावेळी खरेदी करु शकतील. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 जणांच्या गर्दीला परवानगी असेल.
शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात येईल. जुलै महिन्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करुन आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
लॉकडाऊन तीन फेजमध्ये उघडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 जूनपासून धार्मिक स्थळं, हॉटेल, सलून सुरु करण्याची परवानगी दिली जाईल. देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे.