अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी व्हीव्ही पॅट यंत्रे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही यंत्रे ठेवण्यात आली आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकसाठी जिल्ह्यासाठी 9 हजार 949 बॅलेट युनिट, 5 हजार 597 कंट्रोल युनिट आणि 6 हजार 89 व्हीव्ही पॅट यंत्रे आहेत. या सर्वांची प्राथमिक तपासणी सुरू असून भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, बंगळुरूचे 10 अभियंते यासाठी नगरला आलेले आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार गोसावी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य विभागांतील एक उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या देखरेखीखाली 60 कर्मचारी रोज या यंत्रांची तपासणी करत आहेत. त्यासाठी आठ टेबल आहेत.
प्रत्येक अभियंत्यासाठी एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार, असे सहा दिवस तपासणीचे होत आहे. येत्या 10 ऑगस्टपर्यंत हे काम चालेल. नगर एमआयडीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलीस दलाचेही संरक्षण आहे. सुरक्षा व्यवस्था तीन स्तरांमध्ये कार्यरत आहे.
कर्मचार्यांचे मोबाईल बंद
मतदान यंत्रांची तपासणी करतांना कर्मचार्यांचे मोबाईल बंद ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे कामे वेगाने होत आहेत. काही कर्मचार्यांना मात्र यामुळे अस्वस्थ, तर काहींना या निर्णय योग्य वाटत आहे. जोपर्यंत मतदान यंत्राची तपासणी पूर्ण होणार नाही, तो पर्यंत या प्रक्रियेत असणार्या कर्मचार्यांच्या मोबाईल वापरावर बंदी राहणार आहे.