दिल्ली । Delhi
१४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. मकर संक्रातीला सुरू झालेल्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत तब्बल ६२ कोटींहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून दिग्गज कलाकार, सेलिब्रिटी, उद्योजक अतीव श्रद्धेने सहभागी झाले.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात काही अप्रिय घटनाही घडल्या. यावरून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभमध्ये गैरव्यवस्थापन आणि चेंगराचेंगरीच्या घटनांचा दाखला देत महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ संबोधले होते. तसेच इंडिया आघाडीतील सामील पक्षांच्या नेत्यांनीही महाकुंभमेळ्यावरून टीकास्त्र सोडले. यावरून आता पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
गुलामीची मानसिकता असलेले लोक हिंदू धर्मावर हल्ला करत असतात. काही नेते हिंदू धर्माची खिल्ली उडवतात, हिंदू धर्माचा उपहास करतात. परदेशी समर्थन प्राप्त करून ते देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ‘हल्ली आपण बघतो, नेत्यांची एक टोळी धर्माची खिल्ली उडवतात. धर्माचा उपहास करतात, लोकांना विभागण्याचा प्रयत्न करतात. परदेशी शक्तीही या लोकांचं समर्थन करतात आणि देश तसंच धर्माला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक शतकाशतके वेगळ्या काळात जगत आहेत. गुलामीच्या मानसिकतेमध्ये डुबलेले लोक आमची आस्था, विश्वास, मंदिर, आमचा धर्म, संस्कृती आणि सिद्धांतांवर हल्ला करत आहेत’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
दरम्यान, भारतात होत असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. महाकुंभ आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोक महाकुंभमेळ्यात पोहोचले आहेत. कोट्यवधी लोकांनी अद्भूत अनुभव घेतला आहे. संतांचे दर्शन घेतले आहे. आपण या महाकुंभाकडे पाहिले तर आपल्याला सहज लक्षात येईल की, हा एकतेचा महाकुंभ आहे. १४४ वर्षांनी आलेला हा महाकुंभमेळा एकतेचा महाकुंभ म्हणून प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.