Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : "जिथे उमेदवार निवडून..."; मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग...

Manoj Jarange Patil : “जिथे उमेदवार निवडून…”; मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

मुंबई | Mumbai

राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha Election) बिगुल वाजले असून महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यातील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या युती-आघाडीतील जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील यांची आज अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की,” जिथे उमेदवार (Candidate) निवडून येण्याची शक्यता आहे तिथे उमेदवार उभे करायचे आहेत. तसेच एससी आणि एसटी जागा ज्या ठिकाणी आहेत त्याठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही. जे आपल्या विचारांशी सहमत आहेत, त्यांना निवडून आणायचे.जिथे आपले निवडून येणार नाहीत, तिथे जो आपल्याला ५०० रुपयांच्या बॉन्डवर लिहून देईल, की तुमच्या मागण्यांशी सहमत आहोत, त्यांनाच निवडून द्यायचे. नाहीतर सगळ्यांना पाडायचे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “माझी निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही. पण मी समाजापुढे जाणार आहे. आपण राजकारणात (Politics) राहूच नये, असे मला वाटते. जर आपण उभे करायचे ठरवले तर माझेही काही प्रश्न आहेत. माझ्या समाजाचा लढा हा या नादात बंद पडता कामा नये. कारण निवडणुकीत हार-जीत असते. जर यामुळे माझा समाज खचला तर अवघड होईल.तसेच महायुती आणि महाविकासआघाडी (Mahayuti and Mahavikas Aagahdi) हे सख्खे मावसभाऊ आहेत. इकडे उभा करा आणि पाडा म्हणणारे, हेही मावसभाऊ आहेत. आपण उमेदवार उभे केले तर भाजपवाले खुश होतील. आपण उभे केले नाहीत तर महाविकास आघाडीवाले खुश होतील”, असेही त्यांनी म्हटले.

तसेच आपल्यावर जळणारे खूप असून आपल्या हाताने त्यांना संपवायचे नाही. त्यामुळे वेगळा मार्ग काढावा लागेल. महायुती आणि महाविकास आघाडीवाले आशा लावून बसले आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपले एक लाख मतदान आहे, जर ठरले तर दोघांचाही कार्यक्रम करायचा. पक्षाकडून किंवा नेत्याकडून बोलायचे बंद करा. समाज डोळ्यासमोर ठेवून बोला. मी फक्त ३० ते ४० दिवस राजकारणात आहे. मला आणि माझ्या समाजाला उघडं पडू देऊ नका, माझा विश्वासघात होऊ देऊ नका, हे आश्वासन द्या. पाडा म्हणणारे आणि उभे करा म्हणणारेही माझ्यासाठी सारखेच, आंदोलन आणि मी उघडा पडलो तर आपली जात संपेल, असेही मनोज जरांगे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या