मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) प्रचंड बहुमताने सत्ता मिळाल्यानंतर जवळपास १३ दिवसांनी राज्यात नवे सरकार स्थापन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वाचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. येत्या १२ डिसेंबरला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून यासाठी बैठका, चर्चा आणि गाठीभेटींना वेग आला आहे.तसेच अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी आपला नंबर लागावा म्हणून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
अशातच मंत्रिपद देण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार केले होते. त्यामध्ये दोन माजी मंत्री नापास झाले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाल्याच्या चर्चा आहेत. तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे ५ आमदार पास झाले आहेत. संजय राठोड हे विदर्भातून आणि अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातून येतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडून यंदाच्या मंत्रिमंडळात (Cabinet) मंत्री होण्यास अनेकजण इच्छुक आहेत. मागील सरकारच्या काळात काहींना संधी मिळाली नाही. मात्र, यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे हे पास झाले आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती असून यापैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार. त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणे ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी असणार आहे. तसेच शिवसेनेने इच्छुकांचे प्रगतीपुस्तक काढले असले तरी ऐनवेळी काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.