मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती (Recruitment) करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी येथे केली. राज्य सरकारच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात झालेला बदल लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सामान्य प्रशासन विभागाच्या (General Administration Department) वतीने अनुकंपा तत्वावरील तसेच लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी लोकाभिमुख आणि पारदर्शी पद्धतीने आपले काम करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकार अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी शासनाने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिला आहे. आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात केली असून ही समिती विविध राज्यांचा (States) अभ्यास करून निर्णय घेणार आहे. आतापर्यंत ८० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्याचे प्रशासन हे संस्थात्मकदृष्ट्या बळकट करण्याबरोबरच ते गतिमान, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी १०० दिवसांचा आणि नंतर १५० दिवसांचा कार्यक्रम घेतला. यातून अनेक सुधारणा करता आल्या. अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सामान्य प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठे बदल सुरू केले, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.
सेवा प्रवेश नियमात सुधारणा
अनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम ५० वर्षे जुने होते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अगदी लिपिकापासून ते वरच्या स्तरापर्यंत पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. पण नियमांमध्ये बदल झाले नव्हते. रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती सरकारची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शहीद प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला नियुक्ती
अनुकंपा यादीत शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला नियुक्ती देण्यात आली आहे. २६-११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्याच्या मुलीला इतक्या वर्षांनी न्याय देऊ शकलो, हे महत्त्वाचे आहे. अनुष्का बी-फार्म असल्याने तिला ‘औषध निर्माता गट ब’ हे पद अनुकंपावर मिळणे नियमांमुळे कठीण होते, कारण ते पद एमपीएससीकडे होते. पण, आम्ही एमपीएससीला विशेष विनंती करून नियमात शिथिलता मिळवली आणि तिला न्याय दिला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सर्वाधिक उमेदवार कोकण विभागात
दरम्यान, राज्य सरकारी सेवेत नियुक्त होणाऱ्या एकूण १० हजार ३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३ हजार ७८ उमेदवार हे कोकण विभागातील आहेत. तर विदर्भात २, हजार ५९७, पुणे विभागात १ हजार ६७४, नाशिक विभागात १ हजार २५० आणि तर मराठवाड्यातील १ हजार ७१० उमेदवार आहेत.




