मुंबई | Mumbai
राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election) पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) या पाचपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला आल्या आहेत. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. अशातच भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची (Candidates) नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपकडून (BJP) संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली असून ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत. या तिन्ही नावांपैकी संदीप जोशी हे नागपूरचे (Nagpur) माजी महापौर असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरचे असून त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेले आहे. तसेच दादाराव केचे हे आर्वी विधानसभेचे माजी आमदार असून त्यांना विधानसभेच्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी सुमीत वानखेडे यांच्यासाठी केचे यांना थांबावे लागले होते. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
दरम्यान, भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अंतिम यादीत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे. माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. २०१४ साली सत्ता आल्यापासून आतापर्यंत माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी (Madhav Bhandari) हे उमेदवारीपासून वंचित राहताना दिसत आहेत.