Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला! 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील 24 तासांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player

हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे आदेश दिले आहेत. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात यंदाच्या पावसाने आधीच मोठे नुकसान केले आहे. आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये काल रेड अलर्ट असताना केवळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 51 टक्के पाऊस झाला असून, शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पूराचा धोका वाढला असून, प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. स्थानिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज पूर्ण होत आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीतीही आहे. हवामान खात्याने नागरिकांना सावध राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर पाहता, येत्या काही दिवसांत राज्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...