मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve On Parth Pawar) जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील १८०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त ३०० कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा, तसेच केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “राज्यात काय परिस्थिती आहे? देवाभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये लागते. इकडे अजित पवार शेतकर्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? अशी जमीन घेताच येत नाही, तुमच्यासाठी नियम गुंडाळून ठेवले. भूसंपादन झालेली जमीन परत कशी मिळते”, असा सवालही त्यांनी केला.
तसेच “गंमत तर पुढे आहे, एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली.२२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते? (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल”, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.




