मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai to Nagpur Samruddhi Highway) भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. प्रकल्पाचा खर्च १५ हजार कोटी रुपयांनी फुगवला गेला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला. त्यामुळे राज्य सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे (Igatpuri to Aamne) या अंतिम टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी समृद्धी महामार्गाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घोडबंदर- भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला आहे. समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच ५० खोके एकदम ओके चा कार्यक्रम झाला, अशी टीका सपकाळ यांनी केली.
समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱ्यांना (Farmer) भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती पैसे दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरु आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.
समृद्धीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागात तडे गेले आहेत. महामार्ग सुरु झाल्यापासून विविध अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे. त्यामुळे यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.