मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
काँग्रेसचे (Congress) अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष (Ahilyanagar President) सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. गुजर यांना मारहाण करून अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे, असा आरोप करत पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण आणि मारहाण कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी बुधवारी दिला.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरु असताना काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेवर आक्रमक होत सपकाळ यांनी आज भाजप आणि जिल्हा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. विखेंच्या गुंडगिरीला फडणवीसांच्या पोलिसांची साथ असून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण आणि मारहाण महागात पडेल, असेही सपकाळ यांनी बजावले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) लोकशाही अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना आहे. भाजप सरकारने आपले कारनामे दाखवायला सुरुवात केली आहे. नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या दोघांना याआधी रात्री अटक करून कोठडीत टाकण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीतून या दोघांना भाजपाचे माजी खासदार सुजय विखे-पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना दमदाटी करण्यात आली. हा सर्व प्रकार चित्रपटात दाखवतात तसा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. भाजपची ठोकशाही सहन करणार नाही, असेही सपकाळ यांनी ठणकावले आहे.




