मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील पहिले राज्य आहे. देशातील (Country) सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे मुंबई हब बनले असून देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी २४ टक्के महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये (Startups) संपूर्ण देशात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप कॉन्क्लेव २०२५’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत संपूर्ण देशात क्रमांक एकवर असून २०२५ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात २६ हजार ६८६ स्टार्टअप्स आहेत. जे देशातील एकूण स्टार्टअप्सच्या २४ टक्के आहे. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सच्या उपलब्धतेमुळे मुंबई स्टार्टअप्ससाठी सर्वात योग्य ठिकाण बनले आहे.
राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’, ‘मुंबई फिनटेक हब’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबई (Mumbai) हे आर्थिक आणि तांत्रिक इनोव्हेशनचे केंद्र बनले आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एडटेक आणि डीप टेक स्टार्टअप्स झपाट्याने विकसित होत असून देशातील सर्वाधिक म्हणजे २७ युनिकॉर्न कंपन्या महाराष्ट्रात असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
यावर्षी स्टार्टअप्सनी एकूण ३.७ अब्ज डॉलर्सचा निधी प्राप्त केला असून तो गेल्या वर्षाच्या तुलनेत १५४ टक्के अधिक आहे. पुणे (Pune) हे माहिती आणि तंत्रज्ञान, वाहन उद्योग तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. आता नवी मुंबईत ३०० एकरावर देशातील सर्वात आधुनिक ‘इनोव्हेशन सिटी’चे बांधकाम सुरू आहे. जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्स विकसीत होतील, असे शिंदे म्हणाले.
भारतात सध्या दीड लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून भविष्यात भारत हे जगातील सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकते. सीएसआयआर- एनसीएल, सीएसआयआर निरी आणि सीएसआयआर एनआयओ या संस्थांनी या कॉनक्लेव्हचे आयोजन केल्याबद्दल शिंदे यांनी आभार मानले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.