मुबंई | Mumbai
इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणारा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर आज शनिवारी (दि.५) उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून (MNS) वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास (Melva) राज यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “बऱ्याच वर्षांनी माझी आणि राजची भेट व्यासपीठावर झाली आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणापेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाच आहे. आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की ,”मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत, कोण लिंबू कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर हात बाळासाहेब ठाकरे यांचा नसता, तर कुठे असता तुम्ही. मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.





