मुंबई | Mumbai
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अकोल्यात (Akola) शनिवारी (दि.०२) रोजी बोलतांना पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यावरून विरेाधकांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली असून, शिरसाट यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
यावेळी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, “वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटी असे कितीही पैसे मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय”, असे म्हटले. या कार्यक्रमाला आमदार हरीश पिंपळे, अमोल मिटकरी (Amol Mitkari) साजिद खान पठाण, सत्यपाल महाराज, समाजकल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आदी उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांच्या बेडरुमधील व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या बाजूला पैशांची बॅग दिसत होती. त्याआधी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता करण्यावरूनही संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना (Ministers) जबाबदारीने बोलण्याची ताकीद दिली होती. मात्र आता पुन्हा मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदार मिटकरींनी दिले स्पष्टीकरण
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरींनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, संजय शिरसाट यांच्या विधानाचा पराचा कावळा केला गेला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेला विद्यार्थ्याला वस्तीगृहाचे अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते ऍडमिशन देत नाहीत. या अधिकाऱ्यांमुळे सामाजिक न्याय विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे मिटकरींनी म्हणत एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे.





