मुंबई | Mumbai
शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बाहेर पडलेल्या सर्व ४० आमदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, आता गृहविभागाने मंत्र्यांसह आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय १७ फेब्रुवारीपासून लागू केला आहे. यात शिवसेना, भाजप तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांच्या आमदारांचा समावेश असला तरी सुरक्षा पुरविलेल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उघड नाराजी व्यक्त केली असून शिंदे लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे कळते.
राज्यातील व्हीआयपी सुरक्षा (VIP Security) व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या मंत्र्यांचा तसेच आमदारांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री बनलेले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने सुरु असते. त्यात आता सुरक्षेच्या कारणाची नव्याने भर पडली आहे. गृहविभागाने ज्यांना धोका नाही अशा मंत्र्यांची तसेच आमदाराची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजप नेते तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश खाडे, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक मंत्री तसेच आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाचा शिवसेनेच्या आमदारांना सर्वाधिक फटका बसणार असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
शिवसेना (Shivsena) फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेना सर्व आमदारांच्या सुरक्षेत बाढ के ली. शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यावरून अनेकदा सरकारवर आक्षेप घेण्यात आले होते. पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. मात्र आता त्यात कपात करण्यात आली आहे. वाय दर्जाच्या सुरक्षेमुळे आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या, तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस (Police) सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलिस ही कमी करण्यात येणार आहेत.
शिवसेना आमदारांना एकच सुरक्षा रक्षक
नव्या नियमानुसार, शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आमदारांनीही त्यांची नाराजी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्या आमदारांना दिल्याचे समजते.