मुंबई | Mumbai
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या (Hindi Language) या धोरणाला कडाडून विरोध केला करत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना भूमिका मांडत महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की. “आमचे स्पष्ट मत आहे की, महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किंवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते. आपल्याकडे सर्वांत कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदी येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही (Language ) येते”, असे त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, “या निर्णयाकडे राजकारणाच्या (Political) दृष्टीने पाहायचे असेल तर योगायोग बघा.परवा ज्या भेटीगाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील. एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, आम्ही मराठीचा विषय घेतो, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, दोघांचा फायदा लोक मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार असू शकतो”, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “ज्यांनी हे परिपत्रक काढले आहे, त्या मंत्री महोदयांना देखील एकतरी भाषा व्यवस्थित येते का? असे म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसेंना टोला लगावला. तसेच मी कोणाची टिंगल करत नाही, पण तुम्ही गणवेश (Uniform) देऊ शकत नाहीत आणि तिसरी भाषा सक्तीची करणार आहात. अनेक ठिकाणी एकच शिक्षक असतात, त्या शिक्षकांवर किती भार पडणार हे लक्षात ठेवा. देशात आपण धर्मावर भांडत आहोत, जातीवर आणि आता शिक्षणात (Education) भाषा कोणती यावर भांडत आहोत, हे सगळं केंद्र सरकारमुळे झाले आहे. जोपर्यंत ही पद्धत आपण बदलत नाही तोपर्यंत कठीण आहे. माझा भाषेला विरोध नाही. मात्र, ती कशी एक-एक करून शिकवता येईल याचा विचार करायला हवा”, असेही ठाकरे यांनी म्हटले.