मुंबई | Mumbai
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत. आज (सोमवारी) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यांना उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता, इतर सर्व ठिकाणाहून मराठा आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आंदोलकांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
तर दूसरीकडे ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) मनोज जरांगेच्या मागणीला विरोध दर्शवला असून, आज मुंबईत छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट केली. तसेच मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मुंबईत लाखोंच्या संख्येने येऊ, असा इशाराही दिला.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असे म्हणणे हे सामाजिक मुर्खपणा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको आहेत. मराठा समजाला एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटातून आरक्षण दिले आहे. आरक्षण देणे हे मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. परंतु , मराठा समजाला आरक्षण दिल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाऊ ,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “ब्राह्मण समाजही शेती करतो, मग तेदेखील कुणबी होतील का?, आर्थिक मागास असलेल्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण दिले आहे. कुठल्या जातीला ओबीसीत (OBC) समाविष्ट करता येत नाही. हा अधिकार कुणालाही नाही. ओबीसी प्रवर्गात सध्या ३७४ जाती आहेत. ईडब्ल्यूएस शिवाय मराठा समाजाला आणखी १० टक्के आरक्षण दिले आहे. पवार असो किंवा फडणवीस कुणीही ओबीसीत जाती समाविष्ट करू शकत नाही. ज्या पोटजाती होत्या, त्या ओबीसीत आल्या”, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी म्हटले आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने काम केले. आता आणखी काय अभ्यास करायचे असेल तो करावा. सर्रास सरसकट समाजाला कुणबी म्हणणे याला विरोध होणारच. आम्ही जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. आमच्या विरोधात जाणुनबुजून काही गोष्टी केल्या जात असतील तर आम्हीही गणपती झाल्यानंतर मुंबईत येऊ,” असा इशाराही यावेळी मंत्री भुजबळ यांनी दिला.
तसेच “गेल्या ३५ वर्षांपासून मी ओबीसींचा नेता म्हणून मंत्रिमंडळ (Cabinet) आणि याठिकाणी बसलो आहे. जर मराठा म्हणून मंत्री तिथे जात असतील तर मीदेखील गोरगरिब ओबीसींसाठी लढू शकतो. ज्या लोकांनी खोटी प्रमाणपत्रे घेतली त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. भटक्या विमुक्त आणि ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही कुणावर हल्ले करत नाही, पण आमच्यावर हल्ले कशासाठी करता? जर हल्ले होत असतील तर पोलिसांनी ताबडतोब पाऊले उचलायला हवीत,” असेही भुजबळ म्हणाले.





