मुंबई | Mumbai
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो (Santosh Deshmukh Murder Photos) समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली आहे. वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा (Dhananjay Munde) द्यावा लागला आहे. मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की,”धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या मंत्रिपदाचा (Ministership) राजीनामा (Resignation) दिला आहे. हा राजीनामा त्यांनी नैतिकतेवर दिला आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं आहे”, असे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांची राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया काय?
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यांनतर एक्सवर (ट्विट) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात (Court) दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे”, असे मुंडे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.