पुणे | Pune
काँग्रेसला (Congress) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. अशातच आता पुण्यात (Pune) काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्याकडे ईमेल करत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. थोपटे रविवारी भोरमध्ये मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या मेळाव्यात ते काँग्रेस सोडणार असल्याचे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर कारण्याची शक्यता आहे.
संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे मांडेकर हे जायंट किलर ठरले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासूनच संग्राम थोपटे काँग्रेसपासून अलिप्त झाले होते. त्यातच भाजपचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी मध्यस्थी करत थोपटे यांचे भाजप नेतृत्वाशी बोलणे करून दिल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतरच आज संग्राम थोपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, संग्राम थोपटे यांनी आपल्या फेसबुक (Facebook) प्रोफाइलवरील कव्हर फोटो देखील बदलला आहे. पहिल्या कव्हर फोटोवर असणारे काँग्रेसचे चिन्ह त्यांनी काढून टाकले आहे. तर नव्याने अपडेट केलेल्या कव्हर फोटोवरून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले आहे. याधीच्या कव्हर फोटोवर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि त्याच्यापुढे संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो होता. मात्र नव्याने अपडेट करण्यात आलेल्या कव्हर फोटोवर फक्त संग्राम थोपटे यांचे नाव आणि फोटो आहे. तसेच काल (शुक्रवारी) रात्री संग्राम थोपटे यांनी आधीचा कव्हर फोटो काढून नवा फोटो अपडेट केला होता. त्यामुळे त्यांनी यातून काँग्रेसला रामराम ठोकल्याचे संकेत दिले होते.
संग्राम थोपटे होते काँग्रेसमध्ये नाराज
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोपटे यांचा पराभव झाला.ते तेव्हापासूनच पक्षातून बाजूला झाले होते.