मुंबई | Mumbai
धुळे ग्रामीणचे (Dhule Rural) काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी आज (मंगळवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पाटील यांचे कुटुंब जवळपास ७० वर्षे काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले. त्यानंतर आज कुणाल पाटील यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत कमळ हाती घेतले. यावेळी महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार गोरे, जयकुमार रावल यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
कुणाल पाटील यांचे वडील दिवंगत रोहिदास पाटील (Rohidas Patil) हे तब्बल सात वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी मंत्रिपदही भूषवलेले आहे. त्यानंतर आज कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटील यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक तसेच अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर कुणाल पाटील म्हणाले की, “आज माझ्यासाठी महत्त्वाचा व ऐतिहासिक क्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपमध्ये प्रवेश (Join) करत आहे. तीन पिढ्यांचा व ७५ वर्षांची परंपरा सोडून एक सदस्य भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे खरे आहे. माझे आजोबा चुडामण अण्णा पाटील हे १९६२ मध्ये जवाहरलाल नेहरूंची क्रेझ असताना सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून त्यांची ओळख होती. २५ वर्षे त्यांनी सभागृहात दिली. यानंतर १९७८ मध्ये माझे वडील आमदार झाले ते २००९ पर्यंत आमदार होते. माझ्या आधीच्या पिढीने विकासाची परंपरा दिली आहे. ती जबाबदारी आता आमच्यावर आहे. त्यामुळे हा इतिहास आमचा खान्देश विसरू शकत नाही”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, भाजपचे दोन टर्मचे धुळ्याचे (Dhule) खासदार व माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांना पराभूत करण्यासाठी कुणाल पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोलाची कामगिरी पार पाडली होती. तर लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा ६६ हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर आज त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे.




