मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aagahdi) घटक पक्षांमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. यात प्रामुख्याने ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जास्त प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या पक्षाने आणि भाजपाने मोठी ऑफर दिल्याचा दावा माध्यमांशी बोलतांना केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी खैरे म्हणाले की,”लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करूपण मी त्यांना नकार दिला. त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार मिळत नव्हता. मात्र, मी त्यांना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात काम करणार आहे,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
तसेच पुढे ते म्हणाले की,”भारतीय जनता पक्षाकडूनही (BJP) मला खूप वेळा ऑफर आली. भाजपाचे काही नेते माझ्याकडे अनेकदा येऊन गेले. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेते होते. मात्र, माझा संपर्क अनेक वर्षांपासून दिल्लीतील नेत्यांबरोबर देखील आहे. त्यामुळे मला दिल्लीमधूनही ऑफर आली होती. अनेक मान्यवरांनी मला सांगितले की तुम्ही आमच्याकडे येऊन जा. आम्ही तुम्हाला राज्यसभेची खासदारकी आणि मंत्री करतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, तेव्हा मलाही सांगितलं की तुम्हाला राज्यपाल करू अशी ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना नकार दिला”, असेही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेविरोधात आक्रमकपणा दाखवतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील धार कमी केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेने मध्यंतरी फडणवीस यांचे कौतुक देखील केले होते. त्यातच आता खैरे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्यावर राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.