मुंबई | Mumbai
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी भेटून त्यांचे मत जाणून घेईल, असे म्हटले होते.
त्यानतंर आज कृषीमंत्री कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी कृषीमंत्री कोकाटे यांचे चांगलेच कान टोचले आहेत. अजित पवारांनी कोकाटे यांना बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची (Government) बदनामी होते, असे म्हणत समज दिली आहे. त्यावर कोकाटे यांनी ‘यापुढे बोलतांना, वागताना काळजी घेईल’, असे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer) एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली. त्यावर अजित पवारांनी हा विषय माझ्याकडे राहिला नसून मुख्यमंत्र्यांकडे (CM) गेला आहे, असे म्हटले. तसेच कोकाटे यांना मंत्रीपद देतांना तुम्ही मंत्रीपद देऊ नका असे म्हटला नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी शेतकऱ्यांना झापल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीत पवारांची सर्व मंत्र्यांना ताकीद
आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्याआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची (NCP Mninister) अजित पवारांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी सर्व मंत्र्यांना मीडियाशी बोलतांना भान ठेवा, महत्त्वाचे असेल तरच बोला, असे म्हणत सर्व मंत्र्यांना ताकीद दिली आहे.
राजीनामा नाही, खातेबदल होणार?
अजित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय आता माझ्याकडे नसून तो,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही अजित पवारांनी सांगितल्याचे समजते. तर दुसरीकडे कोकाटे यांचा राजीनामा न होता त्यांचे खाते बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.





