मुंबई | Mumbai
मनसेसह मविआने (MNS-MVA) आज (शनिवार)मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून आज (०१ नोव्हेंबर) रोजी फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमामार्गे ‘सत्याचा मोर्चा’ काढला.यानंतर मुंबई महापालिकेच्या (Mumbai NMC) प्रवेशद्वारावर नेत्यांच्या सांगता सभांनी मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळसाहेब थोरात यांची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणांतून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले, “आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. संयुक्त महाराष्ट्रावेळी असे मोर्चे निघाले होते. काळा घोडा परिसरातील मोर्चे विशेष होते. त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली आहे. यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीत संविधानाने तुम्हाला-आम्हाला जो अधिकार दिला त्याची जतन करण्याची वेळ आली आली आहे कारण सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे.निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवर जो विश्वास होता त्याला धक्का बसला”, असे शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले.
पुढे ते म्हणाले, “आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ असून, सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे. या सगळ्याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकांमध्ये संघर्ष असू शकतात पण या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीचा (Democracy) जो अधिकार आहे तो आपल्याला जतन करावा लागेल. हाच दृष्टीकोन समोर ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर हे आमदार यांना जे अनुभव आले. त्यांनी अनुभव सांगितला. त्याचा गैरवापर केला जात असून,याला तोंड द्यावं लागेल.”, असेही शरद पवार यांनी म्हटले.
तसेच “काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली,बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. जिल्हाधिकारी म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे सरकार (Government) या सगळ्याला समर्थन देत आहे. राजकीय मतभेद असू शकतात,निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सर्व गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल आणि या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीतील हा अधिकार जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला आणि मतचोरी थांबवू वा लोकशाही कशी टिकेल याचा निर्धार केला पाहिजे”, असेही शरद पवार म्हणाले.




