मुंबई | Mumbai
गेल्या अनेक वर्षांपासून महराष्ट्रातील जनतेची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चा अधिक जोमाने सुरु होतात. पंरतु, ते काही सत्यात उतरत नाही. अशातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनासोबतच्या युतीवर मोठे विधान केले आहे.
अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा (Maharashtra) स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”, असे उत्तर त्यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.
पुढे महेश मांजरेकरांनी ‘शिंदेची शिवसेना (Shinde Shivsena) टेकओव्हर करायला हरकत नव्हती’, असा दुसरा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “मी आयत्या पीठावर रेघोट्या ओढत नाही. मुळात शिंदेचे बाहेर पडणे, शिंदे फुटणे हा वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी माझ्याकडेही आमदार खासदार आले होते ना. मलाही त्यावेळी काहीही शक्य होते. पण माझ्या डोक्यात त्यावेळी एकच होते की, मी बाळासाहेबांशिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. उद्धव सोबत मला काम करायला काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का सोबत काम करावं?” असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी मांजरेकरांच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिले.
तसेच महेश मांजरेकरांनी यावेळी राज ठाकरेंना ‘महाराष्ट्रासाठी मनसे आणि भाजपा (MNS and BJP) एकत्र येणं गरजेचं आहे का?’ असाही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले की, “मी महाराष्ट्रासाठी जे करू शकतो, त्याकरता भाजपाबरोबर एकत्र येणे हे राजकीय होईल. पण आमच्या सर्वच बाबतीत एकमत होईलच,असे नाही. आम्ही एकमेकांना हस्तांदोलनही करू शकतो किवा एकमेकांना पाहून हातही जोडू शकतो. महाराष्ट्र हडपण्याचा जो प्रयत्न दिसतो, त्याविरोधात मी जेव्हा बोलेन तेव्हा हे पक्ष मला किती साथ देतील हे मला माहीत नाही”, असे त्यांनी म्हटले.