मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) घवघवीत मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये (Mahayuti) नाराजीनाट्य असल्याचे दिसून येत आहे. शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत सुरु नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबत माध्यमांशी बोलतांना मोठा दावा केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की,”भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम झाले असून आता त्यांचे स्वतःचे काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही (People) हे माहीत आहे. येत्या काही दिवसांत त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल. हे मी स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो”, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.
तसेच “जे लोक आमचा पक्ष सोडत आहेत ते पदाधिकारी आहेत. पुढील दोन दिवसांत आमची बैठक होणार असून आम्ही काही जणांना नव्याने जबाबदारी देणार आहोत. आम्ही खचणारे लोक नसून जाणाऱ्यांना जाऊ द्या. त्यांच्या काहीतरी अडचणी असून जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही लोकांची मने कमकुवत झाली असून लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत. अशा लोकांना पक्षात ठेवून तरी काय करायचे”, असे म्हणत संजय राऊतांनी पक्ष सोडणाऱ्या लोकांवर निशाणा साधला.
संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात?
मराठा आंदोलक मनोज जरांगेंची (Manoj Jarange) धार कमी करण्यासाठी भाजप आमदार सुरेश धसांना (Suresh Dhas) पुढे करण्यात आले. सुरेश धसांनीच संतोष देशमुख प्रकरणात आंदोलन उभे केले. आकाचे आका शब्द आम्ही आणले नाहीत. हे शब्द भाजपने आणले, चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीसांनी यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजपचा हात आहे का? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.