मुंबई | Mumbai
छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काल (शनिवारी) रायगडावर (Raigad) कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना शहा यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे म्हटले. यानंतर आता अमित शाहा यांच्या भाषणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना टीकास्त्र सोडले आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे ज्ञान अमित शाहांकडून (Amit Shah) घेण्याची वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. छत्रपती काय होते, त्यांचा विचार काय होता, त्यांची भूमिका काय होती, महाराष्ट्राने काय केलं पाहिजे? वैगरे वैगरे… ज्यांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाने सुडाने कारवाया केलेल्या आहेत, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि लोक माना डुलवणार, या राज्यावर इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही”, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
राऊत पुढे म्हणाले की, “अमित शहा यांच्या भाषणात (Speech) त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी, असा एकेरी उल्लेख केला आहे. ऐरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. ते छत्रपती किंवा महाराज आहेत, हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहिती नाही. ते रायगडावर येऊन शिवाजी महाराजांवर महाराष्ट्राला ज्ञान देतात. हे कुठले ज्ञानदेव आम्हाला ज्ञान देणारे? या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. तुमची जीभ महाराजांना अरे तुरे करायला धजावते कशी? देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? आता तुम्ही शहांचा कडेलोट करणार का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (CM) गुन्हा दाखल केला पाहिजे”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच “गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाचं थडगं उखडून टाकण्याच्या विचारांनी भारावून गेले होते. आम्ही औरंगजेबाचे थंडगं किवा कबर म्हणतो, औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छावा चित्रपटाचे शो ठेवले होते. पण आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधी असा केला. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावरुन छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला यापेक्षा महाराष्ट्रात (Maharashtra) वाईट काय घडणार? मग इतक्या हाणामाऱ्या, दंगली कशाला घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? त्यामुळे औरंगजेबाविषयी इतकं प्रेम गुजरातच्या नेत्यांना आहे. हिंदुत्वाच्या शत्रूला समाधीचा दर्जा देण्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केले. छत्रपतींचे वंशज हे बाजूला बसलेले होते. त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा होता”, असेही संजय राऊत म्हणाले.