नाशिक | Nashik
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या पाच दिवसांपासून (१६ ते २० ऑगस्ट) दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस (Rain) पडला आहे. त्यानंतर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (गुरुवार) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार (दि.२२) रोजी पाऊस आणखी ओसरण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे पुढील आठवड्यात मंगळवार ते गुरुवार (दि.२६ ते २८ ऑगस्ट) या कालावधीत ऋषीपंचमी ते हरतालिक दरम्यान, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई, ठाणे, पालघर, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. हा पाऊस (Rain) बंगालच्या उपसागरात २४ ऑगस्टदरम्यान MJO (Madden-Julian Oscillation) च्या प्रवेशामुळे आणि कमी दाब क्षेत्राच्या वायव्य दिशेने होणाऱ्या हालचालीमुळे अपेक्षित आहे.
पूर परिस्थितीचा धोका
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्या तसेच विदर्भ आणि खान्देशातील नद्यांच्या पात्रात पुढील आठवड्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ होऊन पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या पावसाला कारणीभूत वातावरणीय प्रणाल्या
हवामान तज्ज्ञांनी सध्याच्या पावसाला पोषक ठरणाऱ्या खालील वातावरणीय प्रणालींचा उल्लेख केला आहे.
१) ओरिसा-छत्तीसगड सीमेवरील तीव्र कमी दाब क्षेत्र
२) दीव, सुरत, नंदुरबार, अमरावती ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला मान्सूनचा कमी दाबाचा आस.
३) अरबी समुद्र आणि गुजरातवर ५.८ ते ७.६ किमी उंचीवरील चक्रीय वारा स्थिती.
४) समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किमी उंचीवर असमान वेगवान वाऱ्यांचा शिअर झोन.
५) गुजरात ते केरळ किनारपट्टी समांतर अरबी समुद्रातील कमी दाबाची द्रोणीय स्थिती.
मघा नक्षत्र आणि पाऊस
सध्या सुरू असलेल्या मघा नक्षत्रात, निंबो-स्ट्रॅटस ढगांमुळे संथ गतीने आणि थंडावा पसरवणारा पाऊस पडत आहे. यंदा MJO आणि वर उल्लेखित वातावरणीय प्रणालींच्या साथीने महाराष्ट्रात पावसाचे सातत्य कायम असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
वीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे राज्यातील १९ जिल्ह्यांत २० लाख १२ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात सर्वाधिक ७ लाख १३ हजार ८५७हेक्टर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३९२ एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे भरणे यांनी सांगितले.
राज्यात ८१ टक्के पाणीसाठा
एकीकडे नुकसानीचे हे चित्र असतानाच राज्यातील एकूण धरणांमधील पाणीसाठा आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील पाच दिवसांत धरणस्तर १२ टक्क्यांनी वाढला आहे, जो पाच दिवसांपूर्वी ६९ टक्क्यांवर होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता लवकरच मिटेल, अशी चिन्हे आहेत. कोकणात ९१ टक्के, पुणे विभागात ८९ टक्के, नाशिक विभागात ७१ टक्के, संभाजीनगर विभागात ७३ टक्के, अमरावती विभागात एकोणीसशे टक्के आणि नागपूर विभागात ६९ टक्के पाणीसाठा आहे.




