मुंबई | Mumbai
नैऋत्य मोसमी (Monsoon Rain) वाऱ्यांनी अर्थात मान्सूनने बुधवारी मराठवाडा तसेच विदर्भात (Marathwada and Vidarbha) प्रवेश केला असून राज्यात काल पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain) अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. मुंबई पुण्यासह कोकण, विदर्भातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मुंबईत वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री झाल्यानंतरचा पहिला पाऊस काल सकाळी नाशकात झाला.
नाशकात (Nashik) सकाळी अकराच्या सुमारास अचानक ढंग दाटून आले. यानंतर सर्वत्र पावसाचे वातावरण झाले. त्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. २१ मि.मी. पाऊस शहरात झाला. जिल्ह्यातील बागलाण, सुरगाणा, सिन्नर, निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, त्र्यंबकेश्वर, येवला या ठिकाणीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले.
नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागात मान्सूनच्या वाटचालीस वातावरण अनुकूल तयार झाले आहे. बुधवार (दि. २८) ते शनिवार दि.३१ मे दरम्यानच्या चार दिवसात खान्देश, नाशिक तसेच संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती त्याची प्रचिती आज आली. दरम्यान, या पावसाने (Rain) नाशिकच्या आठवडे बाजारावर पाणी फिरल्याचे दिसून आले. दर बुधवारी गोदावरीकाठी बाजार भरतो. त्यासाठी धान्य बाजारात विविध शेतकरी माल घेऊन येतात. मात्र आजच्या पावसाने त्यांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान, काल नाशिक जिल्ह्यात (Nashik District) झालेल्या पावसामुळे लासलगाव बाजार पेठ व मार्केट कमिटी शॉपिंगमध्ये पाणी शिरले होते. तर नांदूर शिंगोटेसह परिसरामध्ये सुमारे एक तास जोराच्या पावसाने हजरी लावली. मुंबईच्या अंधेरी पूर्वत ओल्ड नागरदास परिसरात जोरदार पावसामध्ये रिक्षावर झाड कोसळल्याचा धक्कादायक घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू होता याच वेळी अंधेरी ओल्ड नागरदास रोडवर रिक्षा जात असताना रिक्षावर झाड कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत रिक्षाचालक सुखरूप वाचला. मात्र रिक्षावर झाड कोसळल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ अंधेरी ओल्ड नागरदास रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
महाराष्ट्रात वेग कमी
झोडपून काढणाऱ्या पावसानंतर राज्यात बुधवारी पावसाचा वेग मंदावला. दरम्यान, आता राज्यात पाऊस ओसरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात कोकण, मध्य महाराष्ट्र, सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. बुधवारी अनेक भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस नोंदवण्यात आला. घाट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक होते. राज्यात गुरुवारपासून अनेक भागात तुरळक पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील.